Friday 4 September 2015

अहिराणीचा आगाजा
     
           अहिराणी भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे.  हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. अहिराणी अतिशय निर्मळ अशी भाषा आहे. त्याचप्रमाणे ती अतिशय सोपीही आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर  भाषा ही बदलत चालल्या आहेत.  अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. ते या निर्मळ मातेचा तिरस्कार करत आहेत. आणि या भाषेला तर आता मृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या व्यथा काही            अहिराणी पुत्रांना मात्र पेलली जात नाही, म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्या या प्रयत्नांचा सर्वांना अभिमान वाटायला हवा. आणि त्याचबरोबर या मंडळींना पाठींबा ही द्यायला हवे.
             मंडळी, अहिराणी भाषा हि एक श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहूण द्वाराकेला पळाले, म्हणून त्यांस रणछोडदास असे म्हणतात. हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशुपाल खुपच रमले. या पशूपालांना अहिर म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे अहिराणी भाषा होय.  पुढे द्वाराकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला. कृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. कन्हैयाचा कान्हदेश. पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला. या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .    
             खान्देशात महाभारतातील कौरव, पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.
 आणि ते पुढीलप्रमाणे :
नन्द राजाच्या नावावरून नंदान      
धर्म च्या नावावरून धमानं      
भीमच्या नावावरून बामनं  
अर्जुन च्या नावावरून जूनून
जयद्रथ च्या नावावरून जैतान
श्रीधर च्या नावावरून शिरधार
मुकुंदा च्या नावावरून कुंडान
गोविन्दा च्या नावावरून वैदान                              अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान
बलराम च्या नावावरून बळसान
दुशासन च्या नावावरून दूसान
               अशा प्रकारची नावे गावांची आहेत व् त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत.  श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवाभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे. भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होत या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव सारंगखेडा या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरते तो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण श्रीकृष्णाची जात अहीर होती. अहीर म्हणजे गवळी ते अहीर लोक. हे अहीर लोक जी भाषा बोलतो ती अहिराणी. अहिरांची भाषा ती अहिराणी. अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारणकी, हि एक वरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले. भक्तप्रल्हाद, बळीराजा, सितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल. अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुरधारी निषाध राजा एकलव्य, रामभक्त शबरी भिल्लिण, दरभंग रूषी, पवनपुत्र हनुमान हे सर्व मंडळी खान्देशी होती.
            महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.
            राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा विर बालक शिरीष कुमार खान्देशी होता.
           आशा या पावन भूमी वर महान मोठमोठे अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे),  रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड), डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना.चौधरी (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत. त्यावर जेवळे लिहीले, तेवळे अपूर्ण पळेल.          
           परंतु, आज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेत. आज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञात नाही. अतिशय मायाळू असणारी या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत. मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे.
               आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवे.  आणि आशा प्रकारेच अहिराणी भाषेला वाचवण्यासाठी बरेच खान्देशी संघटना कार्यरत आहेत. त्यातील खान्देश हित संग्राम ही एक संघटना.
                खान्देश हित संग्राम या संघटनेची मुळ शाखा कल्याण येथे आहे. आणि आपल्या या भाषेला वाचवण्यासाठी ही संघटना अनेक उपक्रम राबवत आहे. आताही ही संघटना आपल्या अहिराणीला वाचवण्यासाठी आसाच एक उपक्रम राबवत आहे. आणि तो उपक्रम म्हणजे अहिराणी साहित्य संमेलन.
               अहिराणी साहित्य संमेलन हे रविवारी दिनांक ९ ऑगस्ट २०१५ रोजी  कल्याण येथे आयोजित करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात खान्देशातील आमदार (मा. श्री. उन्मेश पाटील, मा.श्री. शिरीष चौधरी, मा. श्री. किशोर आप्पा पाटील ) उपस्थित असणार आहेत.  त्याच बरोबर या कार्यक्रमात महत्त्वाचे मोलाची मदत  करणारे कल्याण पुरवंचे आमदार मा. श्री. गणपतशेठ गायकवाड ही असणार आहेत. आणि कल्याण पश्चिम चे आमदार मा. श्री. नरेंद्र पवार ही येणार असणार आहेत.  त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. धनराज विसपुते,   मा. श्री. सुनील चौधरी, मा. श्री. भागवत सैंदाने, मा. श्री. नाना बागुल, मा.  ह. भ. प. पुरुषोत्तम आबा पाटील, मा. श्री. योगेश देसले ही येणार आहेत. या कार्यक्रमात साहित्य संमेलन त्याच बरोबर मनोरंजनाचा कार्यक्रम ही असणार आहे. या मनोरंजनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अहिराणी साहित्य मा. श्री सुभाष अहिरे सरांचे कथाकथन होणार आहे. त्याच बरोबर एक अहिराणी दिरघांकीकाही असणार आहे. या नाटकाचे लेखन खान्देश हित संग्राम संघटनेचे सरसंग्राम मा. श्री. बापूसाहेब हटकर यांनी केले असून मा. श्री. मनोहर खैरनार यांनी दिग्दर्शित केले आहे.
              मंडळी, आपणही या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती.
             
                      चेतन पाटील

No comments:

Post a Comment